मनी लाँड्रिंग प्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यासह माजी आमदार गुलाब यादव यांना अटक

ईडीने केली कारवाई

मनी लाँड्रिंग प्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यासह माजी आमदार गुलाब यादव यांना अटक

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी संजीव हंस आणि माजी आमदार गुलाब यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केली आहे. माहितीनुसार, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या पथकाने संजीव हंस यांना पाटणा येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानातून अटक केली आहे, तर गुलाब यादव यांना दिल्लीतील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली आहे.

संजीव हंस हे १९९७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, संजीव हंस यांनी पंजाबच्या मोहाली आणि कसौलीमध्ये करोडोंची बेनामी मालमत्ता खरेदी केली आहे. कोट्यवधींची संपत्ती मिळवण्याच्या प्रकरणातच ईडीने त्यांना अटक केली आहे. संजीव हंस यांच्यासह अटक करण्यात आलेले गुलाब यादव हे त्यांचे दिल्लीतील जवळचे सहकारी होते.

ईडीने बिहार स्पेशल व्हिजिलन्स युनिट (SVU) सोबत शेअर केलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिहार स्पेशल व्हिजिलन्स युनिटच्या अधिकाऱ्यांचे पथक केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीची तपासणी करत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “एफआयआरमध्ये हंस, यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सुमारे १४ जणांना आरोपी करण्यात आले आहे. सखोल चौकशीसाठी एसव्हीयू त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.”

ईडीच्या छापेमारीनंतर ऑगस्टमध्ये हंस यांची राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली होती. यापूर्वी, एजन्सीने बिहार केडरचे आयएएस अधिकारी संजीव हंस आणि माजी आरजेडी आमदार गुलाब यादव यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग तपासादरम्यान बिहार, दिल्ली आणि पुण्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले होते. संजीव हंस हे वादग्रस्त अधिकारी असून त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. संजीव हंस यांच्यासोबत एका महिलेने राजदचे माजी आमदार गुलाब यादव यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

हे ही वाचा : 

फतवा निघाला, हिंदू संताची बाजू घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांना पराभूत करा…

महाविकास आघाडीत बिघाडी; जागा वाटपाचा वाद चव्हाट्यावर

जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार

२४ कॅरेटची लक्षणे…

मधुबनीच्या झांझारपूर मतदारसंघाचे माजी आमदार गुलाब यादव हे यापूर्वी राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) होते. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना आरजेडीकडून तिकीट मिळाले नव्हते. झांझारपूरची जागा विकासशील इंसान पक्षाच्या (व्हीआयपी) वाट्याला गेली होती. अशा परिस्थितीत गुलाब यादव यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही.

Exit mobile version