मध्यप्रदेशातील फटाका कारखान्यात स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू तर ६० जण जखमी!

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

मध्यप्रदेशातील फटाका कारखान्यात स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू तर ६० जण जखमी!

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील मगरधा रोडवर असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे.एका मागोमाग एक असे अनेक स्फोट झाल्यामुळे फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली.स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.तर ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रुग्णालयातही चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे.मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.याप्रकरणी त्यांनी तातडीची बैठक बोलावली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.पीडित कुटुंबाना सरकारकडून नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.ही दुर्घटना सकाळी ११ च्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी सांगितले की, आज सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला.या स्फोटामुळे कारखान्यात प्रचंड आग लागली आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. आम्ही २०-२५ लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून बचावकार्य सुरू आहे.राज्याचे मुख्यमंत्री या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.जिल्ह्यांमधून रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि एनडीआरएफ पथकांना पाचारण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोग

लिव्ह इनची नोंदणी, हलाला, इद्दतवर बंदी….उत्तराखंड समान नागरी विधेयक सादर

औरंगजेबाने तोडले होते कृष्णजन्मभूमीतील मंदिर!

धर्मांतर रोखण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानात सनातन धर्म स्वीकारण्यासाठी व्यासपीठ

जिल्हाधिकारी ऋषी गर्ग पुढे म्हणाले की, जखमींच्या उपचारासाठी इंदूरच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांच्या बर्न युनिटमध्ये तयारी सुरू झाली आहे.२०० बर्न युनिट बेड तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.इंदूरहून २०आयसीयू रुग्णवाहिका हरदाला रवाना झाल्या आहेत. इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी एमवाय हॉस्पिटलमधील बर्न युनिटची पाहणी केली. अग्निशमन दलाचे जवान आणि बर्न तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक इंदूरहून हरदाला रवाना झाले आहे.

दरम्यान, अग्निशमनच्या ५० हुन अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.कारखान्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.स्फोटामुळे आजूबाजूचे लोक घाबरले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १०० हुन अधिक घरे रिकामी केली आहेत.तसेच स्फोटोमुळे ६० हुन अधिक घरांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, फटाक्यांच्या कारखान्यात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

Exit mobile version