दिल्ली महिलांसाठी सर्वांत असुरक्षित मेट्रोपोलिटन शहर

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची माहिती

दिल्ली महिलांसाठी सर्वांत असुरक्षित मेट्रोपोलिटन शहर

राजधानीचे शहर असणारे दिल्ली महिलांसाठी सर्वांत असुरक्षित शहर असल्याचे उघडकीस आले आहे. देशभरातील मोठ्या १९ शहरांमध्ये महिलांविरोधात नोंद झालेल्या ४८ हजार ७५५ गुन्ह्यांपैकी तब्बल २९.०४ गुन्ह्यांची नोंद एकट्या दिल्लीत झाली आहे. एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने ही माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये सरासरी प्रत्येक दिवशी तीन बलात्कार होतात.

सन २०२२ मध्ये दिल्लीत महिलांवरील १४ हजार १५८ गुन्ह्यांची नोंद झाली. हीच संख्या सन २०२१मध्ये १३ हजार ९८२ होती. दर एक लाख नागरिकांमागे १८६.९ महिलांवर गुन्हे होतात. देशातील मोठ्या शहरांमध्ये नोंद झालेल्या ४८ हजार ७५५ महिलांवरील गुन्ह्यांपैकी तब्बल २९.०४ टक्के गुन्हे एकट्या दिल्लीत नोंदले गेले आहेत. म्हणजेच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे कार्यान्वित नसल्याचेच उघड झाले आहे.

भारतातील सर्वांत असुरक्षित शहर म्हणून जयपूरची नोंद झाली आहे. येथे दर एक लाख नागरिकांमागे २३९.३ महिलांवर गुन्हे घडतात. जयपूरमध्ये महिलांवरील तीन हजार ४७९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी अधिकाधिक महिला पुढे येत असल्याने ही संख्या वाढल्याची माहिती दिल्ली पोलिस उपायुक्त सुमन नालवा यांनी दिली.

‘तक्रारदार पोलिस ठाण्यात येत नाहीत. वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रत्येक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारदारांच्या तक्रारींचे स्टेटस बघतात आणि वरिष्ठ पातळीवर त्याकडे लक्ष देतात. त्यामुळेच महिलांवरील गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. अनेकदा अन्य राज्यांतील तक्रारदारही दिल्लीमध्ये एआयआर दाखल करण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत आम्ही येथे शून्य एफआयआर दाखल करतो आणि नंतर तो अन्य राज्यांमध्ये ट्रान्सफर करतो,’ असेही त्यांनी सांगितले.

मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये तीन हजार ६३५ बलात्कारांची नोंद झाली आहे. त्यातील एक हजार २०४ बलात्कार एकट्या दिल्लीतील आहेत. तर, जयपूरमध्ये ४९७ आणि मुंबईत ३७० बलात्कारांची नोंद झाली.

हे ही वाचा:

इस्रोला मोठं यश; चांद्रयान- ३ चे प्रोप्युलशन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं

‘सर्व मांसाहार स्टॉल्स तात्काळ बंद करा’, भाजप आमदार महंत बालमुकुंद यांचे अधिकाऱ्यांना आदेश!

झोमॅटोवरून ऑर्डर केलेल्या बिर्याणीत सापडला मृत सरडा!

महाबिझ २०२४ समिटचे दुबई येथे आयोजन!

हुंडाबळीच्या घटनाही दिल्लीत सर्वाधिक १२९ नोंदल्या गेल्या आहेत. देशभरात या वर्षी एकूण २८१ हुंडाबळीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक घटना या दिल्लीतील आहेत. त्यामागोमाग लखनऊ आणि कानपूरमध्ये प्रत्येकी ४३ आणि जयपूरमध्ये ३३ घटनांची नोंद झाली आहे.

महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये मात्र मुंबई आघाडीवर आहे. भारतीय दंड संहितेच्या ५०९ कलमांतर्गत देशभरात एक हजार ७५२ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी मुंबईत ६६७, दिल्लीत ४०० तर कोलकात्यात २५० गुन्ह्यांची नोंद झाली.

Exit mobile version