सलमान खानला मारण्यासाठी ‘मेड इन तुर्की’ शस्त्र मागवण्याची होती योजना; हत्येनंतर गाठणार होते विदेश

सलमान खान गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

सलमान खानला मारण्यासाठी ‘मेड इन तुर्की’ शस्त्र मागवण्याची होती योजना; हत्येनंतर गाठणार होते विदेश

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणात बिष्णोई गँगचे नाव समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी वेगाने तपास करत काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून बिष्णोई गँगच्या या हल्ल्याचा कट समोर आला आहे.

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. माहितीनुसार, आरोपींनी पाकिस्तानकडून AK 47, AK 92 आणि M 16 ही आधुनिक शस्त्रे विकत घेण्याची योजना आखली होती. शिवाय, ज्या शस्त्राने गायक सिद्धू मुसावाला याची हत्या करण्यात आली, ते मेड इन तुर्की असलेले जिगना शस्त्रही खरेदी करण्याची योजना आखण्यात आली होती. ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत सलमान खानच्या हत्येचा कट आखण्यात आला होता, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.

जवळपास ६० ते ७० लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर म्हणजेच त्याचे मुंबईतील घर, पनवेलचे फार्म हाऊस आणि गोरेगावमधील फिल्म सिटीमधील वावर अशा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत होते. आरोपींनी सलमान खानला जीवे मारण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांना निवडण्यात आले होते. सर्व शूटर्स हे गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई याच्या आदेशाची वाट पाहत होते. सूचना मिळताच त्यांनी पाकिस्तानमधून आणलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून सलमान खानवर हल्ला केला असता. हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथे वास्तव्यास होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर लोणावळ्यात संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या महिलेला घातला सात लाखांचा गंडा

सलमान खानची हत्या केल्यानंतर आरोपी परदेशात पळून जाणार होते. सलमान खानची हत्या झाल्यानंतर सगळे आरोपी हे कन्याकुमारीला वेगवेगळ्या मार्गाने एका ठिकाणी जमणार होते. त्यानंतर पुढे, एका बोटीने श्रीलंका गाठणार होते. बिष्णोई टोळीने सलमान खानला मारण्यासाठी २५ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहितीही समोर आली आहे.

Exit mobile version