राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची देखरेख करणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटर, स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा

नौदलाने दिले होते कंत्राट

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची देखरेख करणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटर, स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा

सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असताना या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतळ्याची देखरेख आणि निगा राखण्याची जबाबदारी पार पडत असणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, मालवण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित जबाबदार दोघांविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५) सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने ‘मेसर्स आर्टीस्ट्री’ नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर असून केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. त्यामुळे या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन त्यांनी केले नव्हते. केवळ पुतळ्याच्या चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन करून दिले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीने काम केलं होते. शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा कामाचा आणि आपला कोणताही संबंध नाही, असे चेतन पाटील यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

संविधानाला गाजराची पुंगी समजणारे कोण?

‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’

‘प्रचंड वाऱ्यामुळे पुतळा कोसळला’

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या हाती नेतृत्व !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ फुटी पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या भागात जोरदार वारा वाहत असल्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाल्याचे मुखाय्मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version