बदलापूर प्रकरण: महिनाभरानंतर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना ठोकल्या बेड्या

कर्जतमधून पोलिसांनी केली अटक

बदलापूर प्रकरण: महिनाभरानंतर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना ठोकल्या बेड्या

बदलापूर अत्याचार प्रकरणात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. बदलापुरातील नामांकित शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. यानंतर यांना कर्जतमधून अटक करण्यात आली.

बदलापूरमधील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून अटक केली आहे. जवळपास एक महिना हे दोघेही फरार होते अखेर या दोघांना रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर त्यांना उल्हासनगरच्या एसीपी कार्यालयात नेण्यात आलं. तिथून मध्यरात्री १ वाजता उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं. दरम्यान, पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी चक्क डमी आरोपी बसवून एक गाडी रुग्णालयात पाठवली आणि त्यानंतर मागच्या गेटने खऱ्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणलं.

मध्यवर्ती रुग्णालयात मध्यरात्री १ वाजता पासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत असे तब्बल तीन तास उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी उदय कोतवाल यांचा बीपी वाढल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांना मध्यवर्ती रुग्णालयातच पोलिसांच्या निगराणीत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुरुवारी या दोघांनाही कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना इस्रायलमध्ये बंदी

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ – वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्

भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला

डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट

बदलापुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याचे संतप्त पडसाद उमटले होते. मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. तर, संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर ते फरार होते. दरम्यान, दोघांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

Exit mobile version