छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात धुमश्चक्री सुरू असून सुरक्षा दलाला मोठे यश हाती आले आहे. शनिवार, २९ मार्च रोजी सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत सुरक्षा दलांनी १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली आहे. तर, दोन जवान जखमी झाल्याची महिती आहे.
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरलापाल परिसरात शुक्रवारी जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांनी सुरू केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी मोहिमेनंतर ही चकमक सुरू झाली. गुप्त माहितीच्या आधारे या परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती होती. यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) सुंदरराज पी यांनी सांगितले की, या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत आणि दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.
#UPDATE | 16 Naxal bodies have been recovered. 2 jawans sustained minor injuries: Bastar IG, Sundarraj P https://t.co/j6Ay79NqyD
— ANI (@ANI) March 29, 2025
संयुक्त पथक शुक्रवार, २८ मार्च रोजी शोध मोहिमेसाठी निघाले होते आणि शनिवार, २९ मार्च रोजी पहाटेपासूनच अधूनमधून गोळीबार सुरू होता. सध्या सुरक्षा दल चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या जंगली परिसरात सखोल शोध घेत आहेत. या मार्च महिन्यात छत्तीसगड राज्यातील ही चौथी मोठी चकमक आहे.
सुकमा हा छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील सर्वात जास्त नक्षल प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे, जिथे यापूर्वी अनेक नक्षलवादी हल्ले झाले आहेत. शुक्रवारी, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) स्फोटात एक जवान जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस्तरचे महानिरीक्षक म्हणाले, “माओवाद्यांनी बेदमाकोटीकडे लावलेल्या आयईडी स्फोटात एक जवान जखमी झाला. जखमी सैनिकावर नारायणपूर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले जात आहेत.”
केंद्र सरकारने ‘नक्षल मुक्त भारत अभियान’ सुरू केले असून याअंतर्गत सुरक्षा दलांकडून नक्षलग्रस्त भागांमध्ये कारवाई सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारच्या झीरो टॉलरन्स भूमिकेचा पुनरुच्चार वारंवार केला आहे. शिवाय ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. अमित शाह यांनी संसदेत माहिती दिली होती की, २००४ ते २०१४ दरम्यान १६,४६३ हिंसक घटना घडल्या, परंतु गेल्या दहा वर्षांत ही संख्या ५३% ने कमी झाली आहे. त्यांनी नमूद केले की २००४ ते २०१४ पर्यंत १,८५१ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, परंतु गेल्या दहा वर्षांत, मारल्या गेलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या ५०९ पर्यंत घसरली, जी ७३% ची घट आहे. नागरिकांच्या मृत्युची संख्या ४,७६६ वरून १,४९५ पर्यंत कमी झाली, जी ७०% घट आहे.
हे ही वाचा :
पश्चिम बंगालच्या मालदामधील हिंसाचारानंतर ३४ जणांना अटक
भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताकडून वैद्यकीय गोष्टींसह १५ टन मदत साहित्य रवाना
“पंतप्रधान मोदी अत्यंत हुशार व्यक्ती आणि माझे चांगले मित्र”, ट्रम्प असे का म्हणाले?
“आरोग्यासाठी वरदान आहे त्रिफळा, पचनशक्तीपासून रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत लाभदायक”
अमित शाह यांनी पुढे सांगितले की, २०१४ ते २०२४ पर्यंत नक्षलग्रस्त भागात ११,५०३ किलोमीटर महामार्ग बांधण्यात आले. याव्यतिरिक्त, २०,००० किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधण्यात आले. पहिल्या टप्प्यात २,३४३ मोबाईल टॉवर बसवण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात २,५४५ टॉवर बसवण्यात आले. ४,००० मोबाईल टॉवर बसवण्याचे काम अजूनही सुरू आहे.