आता मालवणाक ईमानानं येवा…

आता मालवणाक ईमानानं येवा…

महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक असलेल्या मालवणला आता थेट विमानाने जाणे शक्य होणार आहे. चिपी येथे बांधला जात असलेला विमानतळ पूर्ण झाला असून तेथे लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे गोव्याला सशक्त पर्यटन पर्याय उपलब्ध होऊ केल. सध्या बरेचसे पर्यटक सिंधुदूर्ग आणि आसपासच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गोवा महामार्ग अथवा कोकण रेल्वेचा वापर करतात.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एम.आय.डी.सी) ने या विमानतळाचे बांधकाम आणि संचलन करण्याचे कंत्राट आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीला दिले होते. त्यानंतर आयआरबी सिंधुदूर्ग एअरपोर्ट पीव्हीटी एलटीडी ही वेगळी कंपनी स्थापन करून तिच्या मार्फत या विमानतळाचे बांधकाम आणि संचलनाचे काम पाहिले गेले.

सप्टेंबर २०१८ मध्ये फाल्कॉन २००० या विमानाद्वारे चाचणी घेण्यात आली होती. तत्कालिन नागरी उड्डान मंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २,५०० मीटर आहे. गरज पडल्यास त्याची लांबी ३,४०० मीटर पर्यंत वाढवता येईल.

विमानतळामुळे त्या क्षेत्राच्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन चिपी वाडी, मुक्काम परूळे, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदूर्ग येथे विमानतळाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हा विमानतळ मुंबई-गोवा महामार्गालगत असून मालवणपासून काही अंतरावर आहे.

हा विमानतळ या भागातील एकमेव आहे. यामुळे दक्षिण कोकणाचा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणी राज्ये, मुंबई आणि त्या बरोबरच देशातील विविध भागांशी संपर्क प्रस्थापित होईल.

या विमानतळाची क्षमता वार्षिक दोन दशलक्ष प्रवासी हाताळण्याची आहे. यात गर्दीच्या वेळेत आगमन आणि निर्गमन या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २०० प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. ही क्षमता पुढे दुप्पट केली जाऊ शकते. या विमानतळाचा माल हाताळणी विभाग १०,००० चौ.मी. असून, भविष्यात आणखी मोठा केला जाऊ शकतो.

आयआरबीचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक विरेंद्र म्हैसकर यांनी सांगितले की, “पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे त्या परिसराचा विकास होतो. त्याला विमानतळ देखील अपवाद नाही. आम्ही विमानतळामुळे या परिसराच्या होणाऱ्या विकासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचा मोठा आर्थिक विकास होईल याबद्दल आम्हाला खात्री आहे.”

सप्टेंबर २०२० पासून विविध कागदपत्रांची पुर्तता करून आता हा विमानतळ वापरासाठी खुला होईल असे सांगितले जाते आहे. येत्या गणतंत्र दिवसापासून या विमानतळापासून विमानसेवा सुरू होऊ शकेल. हा विमानतळ बी७३७ आणि ए३२० या विमानांकरिता सुयोग्य असा बनविण्यात आला आहे.

या विमानतळासोबत भारतीय नौसेना उत्तर कन्नडा जिल्ह्यात आम्डाली येथे एक विमानतळ बांधत आहे. या विमानतळावर नागरी विमानांना उतरण्यास परवानगी असेल. कारवार, अंकोला, कुमटा, सिरसी आणि होनावर ही पर्यटन शहरे या विमानतळापासून जवळच आहेत.

(मुंबई मिरर मधून साभार)

Exit mobile version