भारताच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल उत्पादन क्षेत्रात पुढील तीन वर्षांत सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. ऍपल, मायक्रॉन आणि अन्य कंपन्या विश्वासार्ह भागीदार आणि अर्थव्यवस्थेच्या शोधात आहेत, असे त्यांनी नुकत्याच एका अर्थविषयक परिषदेत नमूद केले.
‘आपण जगभरातील सर्वांत वेगवान वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक भाग आहोत. तसेच, पुरवठा साखळी भारताकडे वळवावी, यासाठी आपण कंपन्यांना प्रोत्साहन देत आहोत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील उलाढाल सन २०२५पर्यंत ३०० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठवड्यात भारताने दोन मोठे ‘मेड इन इंडिया’ यश पाहिले. यंदा पहिल्यांदाच आयफोनच्या ‘मेड इन इंडिया’ युनिटमधून आयफोन १५ उपलब्ध झाला. त्याच्या विक्रीला २२ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच आयफोन लाँच झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भारतात फोन उपलब्ध होऊ शकला. तसेच, मायक्रॉन या कंपनीने गुजरातमध्ये २.८ अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये उभारला. भारताने एक मजबूत स्थान निर्माण केल्यामुळे ऍप्पलसारख्या कंपन्या भारतात येत असल्याचे चंद्रशेखर यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा..
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या
रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड
गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा
भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !
या तंत्रज्ञान परिषदेत अन्य कंपन्याही सहभागी झाल्या होत्या. ह्युंदाई इंडियाचे सीओओ तरुण गर्ग आणि वोल्व्हो कार्सच्या संचालक ज्योती मल्होत्रा यांनी नवीन उत्पादने ही शाश्वत आणि एकमेकांशी जोडणारी असतील, असे प्रतिपादन केले. तर, हिरो मोटोच्या माहिती आणि डिजिटल विभागाच्या प्रमुख अधिकारी रिमा जैन यांनी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी त्यांना हवे तसे बदल उत्पादनात करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तर, भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे माजी कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग हुडा यांनी सायबरहल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी केली. सायबरहल्ल्यात मोठे नुकसान होत असल्याने केवळ बचावात्मक पवित्रा घेणे पुरेसे ठरणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.