बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसचे प्रवाशांसह बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून (बीएलए) अपहरण करण्यात आले होते. जवळपास दोन दिवस बचावकार्य पाकिस्तानकडून सुरू होते. माहितीनुसार यात, ३३ बलूच लिबरेशन आर्मीचे अपहरणकर्ते मारले गेले आणि ओलिसांची सुटका करण्यात आली. या घटनेदरम्यान पाकिस्तानने या हल्ल्यामागे भारताचे आणि अफगाणिस्तानचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला होता. यावरून अफगाणिस्तानने पाकला खडेबोल सुनावल्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानला सुनवत टीकेची झोड उठवली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी भारतावर निराधार आरोप केले होते. कोणत्याही पुराव्याशिवाय बलुच बंडखोरांना भारताकडून पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी म्हटले होते. बलुचिस्तानमध्ये झालेल्या जाफर एक्सप्रेस अपहरणात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचा दोष इतरांवर ढकलण्याऐवजी आत डोकावून पाहावे,” अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तानस्थित अतिरेकी सहभागी असल्याचा पाकिस्तानचा दावा तालिबानने गुरुवारी फेटाळून लावला. “बलुचिस्तान प्रांतातील प्रवासी ट्रेनवरील हल्ल्याचा संबंध अफगाणिस्तानशी जोडणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने केलेल्या निराधार आरोपांना आम्ही स्पष्टपणे नाकारतो आणि पाकिस्तानी बाजूने अशा बेजबाबदार वक्तव्यांऐवजी स्वतःच्या सुरक्षा आणि अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो,” असे खडेबोल अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल काहार बल्खी यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.
हे ही वाचा :
युक्रेन- रशिया युद्धात लक्ष घातल्याबद्दल पुतीन यांनी पंतप्रधान मोदींसह जागतिक नेत्यांचे मानले आभार
आयपीएल २०२५ ईशान किशनसाठी सुवर्णसंधी!
बीएलएच्या ताब्यात अजूनही १५४ जवान? प्रत्यक्षदर्शी सैनिकाने पाक सेनेचा दावा केला उघड!
कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन!
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली होती. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच लिबरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा सुरू असून यासाठी अनेकदा बलूच लिबरेशन आर्मीकडून हल्ले सुरू असतात. मंगळवारी सुमारे ४५० लोकांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेसवर बलुच लिबरेशन आर्मीने बॉम्ब आणि बंदुकांनी हल्ला केला. ही ट्रेन क्वेटाहून पेशावरला जात असताना सिब्बीजवळील बोगद्यात अडवण्यात आली. बलूच लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की त्यांच्याकडे २०० हून अधिक ओलिस होते, ज्यात बहुतेक सुरक्षा आणि गुप्तचर कर्मचारी होते.