भारताने आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला ६८ धावांनी पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिली आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघ २०१४च्या टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. २००७मध्ये भारताने पहिल्यावहिल्या टी-२० स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते.
गयानामध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करून १७१ धावा केल्या होत्या. त्यांनी इंग्लंडसमोर १७२ धावांचे लक्ष्य समोर ठेवले होते. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ १०३ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर, बुमराहने दोन विकेट मिळवल्या.
इंग्लंडकडून सर्वाधिक धावा केल्या त्या हॅरी ब्रूक याने. त्याने २५ धावांची खेळी केली. तर, जोस बटलर याने २३ आणि जोफ्रा आर्चरने २१ धावा केल्या. इंग्लंडचे सहा फलंदाज दोनआकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. सन २०२२मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला १० विकेटने पराभूत केले होते. गयानात झालेल्या सामन्यात भारताने या पराभवाचा वचपा काढला.
हे ही वाचा:
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी सहा. पालिका आयुक्त बेल्लाळेंची आठ तास चौकशी
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर
देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन परतणाऱ्या १३ भाविकांवर काळाचा घाला
गयानातील प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांत सात विकेट गमावून १७१ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहितने ५७ धावा केल्या. तर, सूर्यकुमार यादवने ४७ आणि हार्दिक पांड्याने २३ धावा केल्या. स्पर्धेवर पावसाचे सावट होते.
सामन्याच्या सुरुवातील पाऊस पडल्याने सामना उशिराने सुरू झाला. त्यातच भारत आठवे षटक खेळत असताना पावसाने हजेरी लावली आणि सामन्यात व्यत्यय आला. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डन याने तीन विकेट घेतल्या आणि सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टॉपले याने प्रत्येकी एक विकेट घेतली.